*
पुष्प ={४३},
*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
महाराज आपल्याला सतत सांभाळत असतात याचा अनुभव मामींना अनेकदा आला.
एकदा मामांच्या घरी मामा कचेरीतून घरी यायची वाट पाहत श्री भालचंद्र देव आणि रावसाहेब थांबले होते. काहीतरी महत्वाचं काम होतं.
श्री भालचंद्र देव महाराजांचे भक्तच होते. त्यांचा वाङमयाचा, विशेषतः संतवाङमयाचा अभ्यास होता. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. अशा या व्यासंगी नि विद्वान असूनही अत्यंत श्रध्दाळू असणाऱ्या देवांच्यावर महाराजांचा मोठा लोभ होता. त्यांच्या कृपेनं देवांना विलक्षण असे अतींद्रिय अनुभव आले होते. त्यांच्या हातून उत्तम लेखन झालं होतं. अनेक प्रवचनांतून आणि व्याख्यानांतून त्यांनी महाराजांचा उपदेश लोकांपर्यंत पोचवला होता.
मामांची घरी यायची वेळ होऊन गेली. मामी अस्वस्थ झाल्या. आतबाहेर करू लागल्या. अखेरीस न राहून म्हणाल्या, "अहो, अजून आले कसे नाहीत हे ?"
"येतील हो. वाटेतच असतील. नाहीतर येता येता गेले असतील कुठेतरी."
"नाही. ते सरळ घरीच येतात. मला तर काळजी वाटायला लागलीय."
मामी असं म्हणत असतानाच एक माणूस घाईगडबडीनं आला. दारातूनच म्हणाला, "मामांना अपघात झालाय."
"कसा ? कुठे ?" देवांनी विचारलं. मामी तर सुन्न झाल्या.
"ते सायकलवरून घरी येत होते. वाटेत एका मिलिटरी मोटारीखाली सापडले. मी त्यांच्याबरोबरच होतो. आम्ही त्यांना ससूनमध्ये पोचवलंय."
मामी मटकन खालीच बसल्या.
"तुम्ही काळजी करू नका, मामी." रावसाहेब त्यांना धीर देत म्हणाले, "आम्ही लगेच जातो ससूनमध्ये."
"मी पण येत्ये. माझा जीव नाही राहायचा."
मोटारीनं मामांना फर्लांग दीड फर्लांग फरफटत नेलं होतं. मामा जबर जखमी झाले होते. ससूनच्या खाटेवर तळमळत होते. वेदना असह्य होऊन केविलवाणं ओरडत होते.
मामी पदरानं डोळे टिपीत होत्या. त्यांच्या अंगावरून हात फिरवीत होत्या.
बराच वेळ तिथे थांबल्यावर देव म्हणाले, "मामी, आता आपल्याला निघायला हवं."
"ह्यांना असं टाकून ?"
"डॉक्टरांना विचारतो. जमलं तर ह्यांना एखाद्या खासगी दवाखान्यात घेऊन जाऊ या आपण."
देवांनी बाहेर जाऊन विचारणा केली. पण 'अपघाता'ची केस. नीट चौकशी झाल्याशिवाय त्यांना सोडता यायचं नाही असं कळलं.
"मग मी राहू का इथे, हे तरी विचारा.मामी म्हणाल्या.
पण त्यालाही नकार मिळाला. तेव्हा देव म्हणाले, "मामी, मामांना शुद्ध नाहीच आहे. जवळ कोण आहे हे त्यांना कळणारं नाही. मी एखाद्या परिचारीकेला त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगतो. त्याचं तिला देऊ आपण काहीतरी. आपण आत्ता जाऊ आणि लगेच पहाटेच परत येऊ.
नाईलाजानं मामांनी होकर दिला.
दोघं परत निघाली तेव्हा तिथल्या निवासी डॉक्टरांनी देवांना जरा एकीकडे नेऊन म्हटलं, "प्लीज, तुमच्या घराचा पत्ता देऊन जा."
"पत्ता कशाला ? सकाळी लवकरच येतो आम्ही."
"तरीही द्या. कारण पेशंटची अवस्था ठीक नाही. काय भरवसा ? रात्री काही कमीजास्त झालं तर -"
देवांनी मुकाट्यानं पत्ता दिला. मामींना त्यांच्या घरी पोचवून देव घरी आले. मामांच्या विचारानं त्यांना झोप येईना. ते महाराजांचा धावा करीत राहिले. अखेरीस केव्हातरी त्यांचा डोळा लागला. तेव्हा त्यांना दिसलं की महाराज मामांच्या जखमांवरून हात फिरवीत आहेत आणि मामा शांतपणानं झोपले आहेत.
या दृष्टांतानं देव निर्धास्त झाले.
दुसऱ्या दिवशी पाहतात तो मामांच्या वेदना थांबलेल्या होत्या. मामा स्वप्नात दिसले तसे शांतपणानं पडून होते. देवांना पाहताच म्हणाले, "महाराज आले होते."
"मला माहीत आहे. आता तुम्ही खडखडीत बरे होणार, मामा!"
आणि खरोखरच मामा पंधरा दिवसांत घरी आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सर्जन घारपुऱ्यांनी त्यांना घरी सोडताना म्हटलं, "It's miracal ! हे बरे होतील आणि तेही इतक्या लवकर, असं आम्हाला वाटलं नव्हतं."
मामी आनंदून मनातल्या मनात म्हणाल्या, "महाराज तारी, त्याला कोण मारी ?"
महाराजांनीच लेकीचं कुंकू राखलं......क्रमशः ...
*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
No comments:
Post a Comment