Monday, 14 January 2019

Tale 34

*💐💐⚪पुष्प = {७१},⚪💐💐*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*

  सोलापूरचा उंच, गोरा, देखणा, पायजमा आणि शर्ट घातलेला अनंता देशपांडे हा तरूण मुलगा प्रथम महाराजांकडे आला तो त्याच्या एका मित्राबरोबर. तो म्हणाला होता, "इथे शुभराय मठात येणारे शंकरमहाराज फार ज्ञानी आहेत. मोठे मोठे डॉक्टर, वकील, अधिकारी त्यांचे भक्त आहेत. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ या."
  अनंतालाही वाटलं, जावं. एवढे सुशिक्षित लोक ज्यांना गुरूस्थानी मानतात ते महाराज निश्चितच मोठे असले पाहिजेत. आपणही त्यांना गुरु करावं.
  ते दोघे मठात येऊ लागले. महाराजांचा मठात मुक्काम असेल तेव्हा त्यांच्या सस्तंगात राहू लागले. पण अनंताच्या मनाला समाधान वाटेना. महाराजांचं लौकिक दृष्टीला वाटणारं विक्षिप्त वागणं, त्यांचं अर्वाच्य बोलणं, त्यांचं सिगरेट ओढणं या गोष्टी त्याच्या मनाला खटकू लागल्या. तेव्हा एक दिवस तो मित्राला म्हणाला, "माधव, आपण हिमालयात जाऊ या. मी असं ऐकलंय आणि ग्रंथांतून वाचलंही आहे की, तिकडे अनेक सिध्द पुरुष राहतात. गुहेत राहून तपश्चर्या करतात. तिथल्याच एखाद्या साक्षात्कारी सिध्दाला आपण प्रसन्न करून घेऊ. त्याचे शिष्य होऊ. तो सांगेल तशी साधना करू. हे महाराज काही आपल्या कामाचे नाहीत."
  माधवला ते पटलं. मग कुणालाही न सांगता ते दोघे मित्र मजल दरमजल करीत, हिमालयात कुणीतरी योग्य गुरु मिळेल या आशेवर तिकडे गेले. गुरूच्या शोधात भटकत राहिले. तिथल्या एका अवघड शिखराच्या पायथ्याशी एका गुहेत एक महात्मा राहतो असं त्यांना कळलं म्हणून ते त्या गुहेच्या दिशेनं निघाले. बरंच अंतर चालून झाल्यावर त्यांना दूर गुहेसारखं काहीतरी दिसलं. अत्यंत आनंदानं ते समोर दिसणाऱ्या अरूंद वाटेनं चालू लागले.
  पण - पण त्या वाटेनं ते चालू लागले तो काय, बर्फाची एक मोठी भिंत त्यांच्यापुढे उभी राहिली. दोघे गोंधळले. पुढची वाट बंद झालेली. पुढे जाणार कसं ? 
  बर्फ वितळण्याची वाट पाहण्यातही अर्थ नव्हता. कारण संध्याकाळ व्हायला आली होती. तेव्हा दिसतंय तोपर्यंत मागं फिरून मागच्या मुक्कामाला जावं आणि उद्या सकाळीच परत इकडे यावं असं ठरवून ते मागं वळले. 
  पाहतात तो तिथेही बर्फाची अजस्त्र भिंत! म्हणजे आता मागचा मार्गही बंद.
  दोघे अतिशय घाबरले. मोठमोठ्यानं ओरडू लागले. हमसाहमशी रडू लागले. माधव उद्वेगानं म्हणाला, "अंत्या, हे तुझ्या पापाचं प्रायश्चित्त आहे. महाराजांना नावं ठेवलीस त्याची ही शिक्षा मिळते आहे आपल्याला."
  "होय रे होय. मला त्यांचं मोठेपण नाही कळलं. महाराज, महाराज, मी चुकलो. तुमचे पाय सोडून आलो. तुम्ही आमचे मायबाप. लेकराला क्षमा करा. आम्हाला या प्राणसंकटातून वाचवा हो!"
  दोघंही महाराजांना कळवळून हाका मारू लागले.
  "भडव्याऽ" तेवढ्यात त्यांच्या कानावर ही शिवी पडली. दोघांनी आनंदानं एकमेकांकडे पाहिले. हा आवाज महाराजांचाच ! आले. आले. महाराज आपल्यासाठी धावून आले.
  खरोखरच महाराज प्रकट झाले होते. म्हणत होते, "महाराज रांगडे. महाराज दारूडे. महाराज वेडेवाकडे. मग आता कशाला रे त्यांच्या नावानं ओरडतो आहेस ? बोंबलतो आहेस?"
  दोघांनी त्यांचे पाय धरले. डोळे पुसत म्हटलं, "आम्हाला क्षमा करा, महाराज."
  "बरं... बरं... कळली अक्कल!" त्यांना उठवीत महाराज म्हणाले, "जा आता परत आपल्या घरी. तिकडे माणसं डोळ्यात प्राण आणून तुमची वाट पाहत आहेत."
  महाराज लगेच दिसेनासे झाले. आणि त्याबरोबरच त्या बर्फांच्या भिंतीही नाहीशा झाल्या. सुटकेचा नि:श्वास टाकून दोघेही परत फिरले.
  सोलापूरला पुन्हा महाराजांची भेट होताच महाराजांनी मिश्किलपणानं विचारलं, "अंत्या, तू इथे कसा ? हिमालयात कुणी गुरु भेटला नाही ?"
  अनंतानं त्यांचे पाय धरून खालमानेनं म्हटलं, "महाराज, का आम्हाला लाजवता ? तिकडे मला तुम्हीच भेटलात. माझे गुरू. माझे मायबाप. माझे प्राणदाते! आता मी तुम्हांला सर्वस्वी शरण आलो आहे."
  अनंत आणि महाराज यांचं हे बोलणं ऐकणाऱ्या माणसांनी विचारलं, "अनंता, ही हिमालयाची काय भानगड आहे रे ?"
  त्यावर अनंतानं ती सर्व अदभूत कथा सांगितली. आपण महाराजांचा कसा धावा केला आणि महाराज तातडीनं कसे धावून आले हेही सांगितलं. त्या वेळी महाराज मात्र अंतराळी डोळे लावून म्हणत होते...
"मस्त फकीरका कौन ठिकाना। मैं तो दुनिया घुमा।
 तडप-तडप से जौ न पुकारा। उसके दर पर जा थमा॥"
"कळवळोनी मज घालता साद। तत्क्षण मी उभा दारात॥"....क्रमशः ...

 *🍁 लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी 🍁*

No comments:

Post a Comment