*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*
शुभराय मठात श्री. अनंताचार्य उम्रणकर नावाचे गरीब ब्राह्मण राहत होते. एकदा एका घरी अभिषेक करून परत मठात येताना त्यांच्या मनात सहजच एक विचार आला. वाटलं की, महाराज श्रीमंत लोकांबरोबर सगळीकडे जातात. पण आपण पडलो गरीब. त्यांच्याबरोबर जायचा योग आपल्या नशिबी कुठून असणार ?
हा असा विचार त्यांच्या मनात यायला आणि रस्त्यावर समोरून महाराज यायला एकच गाठ पडली अनंताचार्यांनी महाराजांना नमस्कार केला. महाराज म्हणाले, "जा. घरी जाऊन सोवळं बदलून साधे कपडे घाल आणि स्टेशनवर ये. आपल्याला मुंबईला जायचं आहे. अरे, असा बघतोस काय 'आ' करून ? जा. लवकर ये."
अनंताचार्यांना अतिशय आनंद झाला. ते घरी जाऊन प्रवासाच्या तयारीने स्टेशनवर गेले. महाराज त्यांची वाट पाहत उभेच होते.
दोघेजण मुंबईला श्री. केशवजीभाई अशर यांचे घरी गेले. तिथे जेवणखाण झाल्यावर महाराजांनी अशरांना विचारलं, "आम्ही सांगितलेली बोटीची दोन तिकिटं काढलीस ना ?"
"होय, महाराज." असं म्हणून अशरांनी त्यांना तिकिटं आणून दिली. अनंताचार्य मंत्रमुग्ध झाल्यासारखे महाराजांच्याकडे पाहत राहिले. त्यांना कळेना, आपण स्वप्नात आहोत की जागे ?
नंतर महाराज त्यांना घेऊन परदेशभ्रमणाला निघाले. मस्कत,बगदाद, इंग्लंड, फ्रान्स, इराण, इटली अशी अनेक ठिकाणं त्यांना दाखवली. युरोप आणि अरब देशांतून फिरल्यावर महाराजांनी विचारलं, "काय अनंता, प्रवासाची हौस फिटली की नाही ? की अजून कुठे जायचंय?"
"सगळं भरून पावलं, महाराज! या गरिबाला दुनियेचं अजब दर्शन घडवलंत. आपली कृपा अपार आहे."
प्रवासात अनंताचार्यांना आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. ते जिथे जात तिथे लोक महाराजांना ओळखीत होते. त्यांच्याशी अतिशय आदरानं वागत होते. कुणी त्यांना 'नूर महंमद' म्हणून ओळखीत होतं, तर कुठे त्यांना 'जाँनसाहेब' , 'स्टीमबाबा' म्हणून हाका मारीत होते. जितके देश, तितकी गावं, पण महाराज मात्र एकच !
आणखी नवल म्हणजे महाराजसुद्धा त्या सर्वांशी त्यांच्या भाषेत बोलत होते.
एक महिन्याने दोघे सोलापूरला परत आले. तेव्हा महाराज अनंताचार्यांकडे रोखून पाहत म्हणाले, "मग काय अनंता, आम्ही केवळ श्रीमंत माणसांबरोबर फिरतो. असंच ना ?"
अनंताचार्य काय बोलणार ? त्यांनी फक्त पुढे होऊन महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं.
अनंताचार्यांना महाराजांनी महिनाभर फिरवून आणलं. पण रामभाऊ अकोलकरांना महाराजांनी एका दिवसात चारीधामांची यात्रा करवून आणली.
रामभाऊ हे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचे क्षेत्रउपाध्ये होते. महाराज नेहमी त्यांच्याकडे उतरायचे. एकदा रामभाऊंनी त्यांना विचारलं, "महाराज, आपण अनेक क्षेत्रांना भेटी देता, ती कशी आहेत हो ? मला ती पाहावीत असं फार वाटतं. पण काय करणार ? मी पडलो क्षेत्रउपाध्ये. मला हे क्षेत्र सोडून कुठे जाता येत नाही. वस्तीला इथेच राहावं लागतं."
"उद्या सांगू तुला दुसरी क्षेत्रं कशी आहेत ती. पण एकांतात. पहाटे लौकर तयार हो. घरात सांगून ठेव की, महाराजांबरोबर बाहेर जायचं आहे, उशीर होईल."
महाराज एकांतात आपल्याला काय सांगणार असतील याची कल्पना करण्यातच रामभाऊंची सर्व रात्र संपली. ते पहाटेच उठले. स्नान-संध्या करून महाराजांबरोबर जायला सिद्ध झाले. उत्सुकतेने महाराजांच्या हाकेची वाट पाहत राहिले. तेवढ्यात त्यांनी हाक मारलीच. म्हणाले, "चल. तुला आम्ही तीर्थांचं दर्शन घडवतो."
"पण मी इथून बाहेर कसा जाऊ, महाराज ?"
"ते सगळं आम्ही पाहून घेतो. तू फक्त आम्ही सांगू तसं करायचं. आम्ही डोळे बंद कर म्हटलं की, लगेच डोळे बंद करायचे. आम्ही पुन्हा उघड म्हणेपर्यंत मुळीच उघडायचे नाहीत. कळलं ?"
"होय महाराज. आपण सांगाल तसंच करीन मी."
"हंऽ, डोळे घट्ट बंद कर आता."
आज्ञेप्रमाणे रामभाऊंनी डोळे मिटले. थोड्याच वेळात त्यांचे जमिनीवरचे पाय सुटले. त्यांना जाणवलं की, आपण आकाशातून उडतो आहोत. एखाद्या पक्ष्यासारखे.
थोड्या वेळानं महाराज म्हणाले, "उघड डोळे."
रामभाऊंनी डोळे उघडले. आणि त्यांचा विश्वासच बसेना डोळ्यावर. कारण ते चक्क हिमालयावर आले होते. हिमाच्छादित शिखरे पाहत होते.
"हे बद्रिकेदाराचं मंदिर बघ."
रामभाऊंनी मंदिराच्या प्राकारात जाऊन लक्ष्मी, गणपती, वीर मारूती सर्वांना नमस्कार केला. मग ते गाभाऱ्यात गेले. सिहासनावर बसलेल्या काळ्या पाषाणाच्या, पद्मासन घातलेल्या, ध्यानमुद्रा धारण केलेल्या चतुर्भुज विष्णूच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतलं.
त्याबरोबर महाराज म्हणाले, "चल, मीट डोळे."
रामभाऊंनी डोळे मिटले आणि पुन्हा आकाशात उड्डाण केलं. खरं तर हिमालयातल्या थंडीनं त्यांना हुडहुडी भरली होती. पण ते बोलले नाहीत.
केदारनाथ, गंगाद्वार, हरिद्वार, हृषिकेश इत्यादी तिर्थक्षेत्रं दाखवीत महाराजांनी त्यांना काशीला आणलं. त्रिवेणीसंगमात स्नान घडवलं. तिथून नेलं ते जगन्नाथपुरीला. मग द्वारका, सोमनाथ, नंतर कुरवपूर आणि दक्षिणेकडे कन्याकुमारी, रामेश्वर. तिन्ही समुद्रांचं दर्शन होताच रामभाऊंच्या मनात आलं, 'आपण रोज नुसती स्तोत्रं म्हणत होतो. ज्योतिर्लिंगांचं स्मरण करीत होतो. पण आज त्या सर्वांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. महाराजांच्या कृपेनं या पामराला 'आसेतुहिमाचल' अशा मायभूमीला पाहता आलं. जीवन धन्य झालं !'
कन्याकुमारीच्या तीनही सागरांच्या संगमावर सूर्यास्त होऊ लागला तेव्हा त्या दृश्यात रंगून गेलेल्या रामभाऊंना महाराज म्हणाले, "चला, मिटा डोळे."
रामभाऊंनी डोळे मिटले आणि दोघांनी आकाशगमन केलं. काळोख पडायच्या आत आरतीच्या वेळेला रामभाऊ आपल्या क्षेत्रस्थानी त्र्यंबकेश्वरी परत आले.
रामभाऊंना काही बोलताच येईना. पण त्यांचा उचंबळून आलेला भक्तिभाव महाराजांना कळला. त्यांच्या पाठीवर थोपटीत ते म्हणाले, "जाऽ, आपलं आन्हिक करायला जा.
रात्री तृप्त मनानं रामभाऊ आडवे झाले. त्यांच्या मनात आनंद मावत नव्हता आणि कुणाला तो सांगताही येत नव्हता. एका दिवसात ते भरतखंड फिरून आले त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार ?
सगळी रात्र ते त्या अकल्पित आनंदाच्या लाटांवर तरंगत होते. कालच्या रात्री कल्पनेनं झोप आली नाही आणि आजच्या रात्री अलौकिक अनुभवांच्या आठवणींनी झोप नाही.....क्रमशः ....
*
लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी
*
No comments:
Post a Comment