Monday, 14 January 2019

Tale 30

 *🍁🔆पुष्प = {६६},🔆🍁*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*

      क्रमशः ....

  वाड्यात खालच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या पुणेकर वहिनींची महाराजांवर खूप श्रद्धा होती. महाराजांनी त्यांना आपल्या सामर्थ्याची अनेकदा प्रचिती दिली होती. दर्शनं दिली होती. त्यांचे यजमान वारले तेव्हा ते त्यांच्या विसाव्या दिवशी वहिनींच्या घरी पहिल्यांदाच गेले. त्यांना बघून वहिनींना दु:खावेग आवरेना. पदरी तीन मुलं, कसं होईल त्यांचं ? या विचारात त्यांना चैन पडत नव्हती. पण महाराज त्यांचं सांत्वन करीत म्हणाले होते, 'कसली चिंता करू नकोस, आई. तुझी मुलं चांगलं शिकतील. सुस्थितीत राहतील. हे सांगायलाच आम्ही आलो आहोत. आज विसाव्या दिवशी तुला विसावा द्यायला आलो आहोत."
  त्या दिवसापासून पुणेकर वहिनी सर्व भार महाराजांवर टाकून निश्चिंत राहू लागल्या. ते वाड्यात आले की त्यांच्या सेवेला येऊ लागल्या. 
  आत्ताही त्या त्यांच्यासाठी चहा आणि कांद्याची भजी घेऊन वर आल्या. त्यांना पाहताच महाराज म्हणाले, "आण... आण... भजी आण. आम्हाला केव्हाच त्यांचा खमंग वास आला होता !"
  "तुम्ही कशाला त्रास घेतलात वहिनी, मी करणारच होते आत्ता चहा!" माई म्हणाल्या.
  "आम्हालाही घडू द्या ना थोडी सेवा! आणि त्रास कसला यात ?"
  असं म्हणत वहिनींनी महाराजांना भजी दिली. चहा पाजला. बापूलाही चहा, भजी दिली.
  तेवढ्यात तिथे दोन-तीन माणसं आली. महाराज जिथे कुठे असतील तिथे त्यांचा माग काढीत माणसं यायचीच - फुलातला मध घ्यायला मधमाशा येतात तशी.
  त्यांतल्या एकानं महाराजांना नमस्कार करून म्हटलं, "महाराज, आपल्या आशीर्वादानं मुलीचं लग्न निर्विघ्न पार पडलं."
  "पडलं ना ? मग आता कशाला आला आहेस ?"
  "आपल्यासाठी कपडे शिवायचं मनात आहे. एक पायजमा आणि शर्ट. हा शिंपी आणलाय. फार चांगले, अगदी अंगाबरोबर बेतशीर कपडे शिवतो. कधी घट्ट व्हायचे नाहीत की कधी ढगळे व्हायचे नाहीत." मग तो शिंप्याला म्हणाला, "घे रे, महाराजांचं माप घे लवकर."
  "असं ? हा आमचं माप घेतोय ? घे म्हणावं. बरोबर घे."
  शिंपीदादा टेप घेऊन महाराजांची मापं घेऊ लागला. आणि पार चक्रावून गेला. पुन:पुन्हा त्यांची उंची मोजू लागला. कोठ्याचं माप, हाताची लांबी, कारण दरवेळी वेगळंच माप यायचं. कधी सव्वीस इंच, कधी एकवीस तर कधी बत्तीस इंच. बिचारा अगदी रडवेला झाला.
  महाराज मोठ्यानं हसले. म्हणाले, "आमच्या कपड्यांचं राहू दे. गरज लागली की सांगू आम्ही. पण उद्या समर्थ मठात जाऊन तू गुरूदेवांना एक अभिषेक कर, म्हणजे सगळं पावलं आम्हाला."
  तो निघून गेल्यावर महाराजांनी दुसऱ्या माणसाला त्याच्या येण्याचं कारण विचारलं. तो म्हणाला, "गाणगापूरी जाऊन गुरूचरित्राची तीन पारायणं करायची इच्छा आहे."
  "कशासाठी ?"
  "अवधूताचं दर्शन घडावं म्हणून."
  "भडव्या! दत्तगुरु काय तुझ्या बापाचे नोकर आहेत ? आणि काय रे भोसडीच्या, गाणगापूरपर्यंत जायला पैसा तरी आहे का खिशात ?"
  महाराज दर वाक्यागणिक शिव्या देत होते. आणि दोन शिव्या देऊन झाल्या की म्हणत, 'श्री गुरूदेवदत्त ! श्रीगुरूदेवदत्त !!'
  जणू काही त्या शिव्या भक्ताला दत्तगुरुंकडून आलेली प्रसादभेट होती! भक्त म्हणाला, "नाहीत खरे पैसे, पण घेईन कुणाकडून तरी उसने. पण दर्शनाची अगदी तळमळ लागून राहिलीय, महाराज. चैन पडत नाही." हे बोलताना त्याच्या डोळ्यांत खरोखरच पाणी आलं होतं.
  महाराज काही वेळ त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. मग म्हणाले, "मग पारायणाच्या आधी मला दर्शन द्या असं का म्हणत नाहीस त्यांना ? तुझी पारायणं होईस्तोपर्यंत त्यांनी काय ताटकळत बसायचं होय रे साल्या ?"
  त्या बिचाऱ्याला काहीच समजेना.
  "जा. बाहेरचं दार बंद करून घे."
  त्यानं उठून दार बंद करून घेतलं. आणि मागं वळून बघतो तो काय ? महाराजांच्या ठिकाणी त्याला साक्षात दत्तगुरु दिसले! अत्यानंदानं तो बेभान झाला. ओक्साबोक्सी रडू लागला. धावत येऊन त्यांच्या चरणावर कोसळला. 
  थोड्या वेळानं महाराज त्याला म्हणाले, "पैसा नाही, तर कुठे जाऊ नकोस. इथेच खाली औदुंबराच्या पारावर बसून पारायण कर, पादुकांची पूजा कर. माईच्या वाड्यात ते आहेतच."
  "बरं - आता तुमचं काय ?" महाराजांनी तिसऱ्या गृहस्थांना विचारलं.
  "मी... मी मुलीसाठी स्थळं बघतो आहे. पण कुठे जमतच नाही. ते केव्हा होईल, महाराज ?"
  "आम्ही काय ज्योतिषी आहोत होय? आम्ही त्यातले नाही. माई, तुझ्याकडे महाराजांचा गाथा आहे ना? आण तो."
  माईंनी गाथा आणून त्यांच्यापुढे ठेवला. त्यांनी तो चाळल्यासारखं केलं. काही पानं उलटली. मग ते एका अभंगावर बोट ठेवून म्हणाले, "बापू, वाच हा अभंग."
  महाराजांची ही एक विशिष्ट पद्धत होती. प्रश्न विचारणाऱ्या माणसाच्या वृत्तीप्रमाणे ते त्याच्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष न देता असं समोरच्या एखाद्या ग्रंथातला उतारा वाचून देत. नवल म्हणजे त्यांना जी अपेक्षित असते ती ओवी, तो अभंग, किंवा तो मजकूर ते नेमका काढून देत. ज्ञानेश्वरीतल्या आणि भागवतामधल्या ओव्यांचे क्रमांक सांगत. 
  बापूनं अभंग वाचला. तुकाराम महाराज म्हणत होते -
"भूत-भविष्य वर्तमान। सांगी जाणती शकुन।
 आम्हा त्याचा अवघाचि कंटाळा ॥"
  "ऐकलंस ना ?"
  "होय. पण आपण आशीर्वाद दिलात तर होईल लवकर. आपल्या तोंडून निघेल त्या दिवशी होईल."
  "असं म्हणतोस ? मग 'मी' मेल्यावर होईल तुझ्या लेकीचं लग्न !"
  त्यानं चमकून महाराजांकडे पाहिलं. हे काय विपरीत बोलणं ! म्हणजे आता माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी त्यांच्या मरणाची का वाट पाहायची? 
  त्याची गोंधळलेली आणि धास्तावलेली मुद्रा पाहून बापूला राहवेना. तो त्याला म्हणाला, "तसं नव्हे, दादा. तुम्ही समजता आहात तसा अर्थ नाही महाराजांच्या म्हणण्याचा."
  "मग ?"
  "त्यांना म्हणायचं आहे की, 'तुम्ही जे माझी मुलगी, मी तिचं लग्न जमवतो आहे, मी त्यासाठी खटपट करतो आहे असं सारखं 'मी' आणि 'माझं' म्हणत बसला आहात ना, हा तुमच्यातला 'मी' , 'मी' करणारा अहंकार 'मेला' पाहिजे. तो गेला की होईल तिचं लग्न. लग्नाच्या गाठी वरतूनच बांधलेल्या असतात. आपण कोण त्या जमवणारे ? केवळ लग्नाचंच नव्हे, तर सगळंच त्याच्या इच्छेनं घडत असतं. तुम्ही कर्तेपणा स्वतःकडे न घेता त्याच्या मर्जीवर सर्व सोडून निवांत रहा. असं महाराज तुम्हाला सांगत आहेत."
  "वा ! बाप्या वा ! हरिनाथबाबांनी चांगलाच तयार केलाय हा चेला !" महाराज कौतुकानं हसत म्हणाले, "तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. पण खरा भक्त नुसता मीपणा आणि कर्ताभाव टाकून थांबत नाही. तो 'लोकलाज' ही सोडतो. लोकनिंदेची पर्वा न करता एखाद्या प्रेयसीसारखा प्रियतम परमेश्वराच्या प्रीतीरसात रंगून जातो. अभिसारिका होतो. प्रेमभक्तीच्या कैफानं धुंद होऊन जातो.
  मद्यानं येणारी धुंदी काही काळानं उतरते. पण ही धुंदी एकदा चढली की कधीच उतरत नाही..... क्रमशः ...

*‼ लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी‼*

No comments:

Post a Comment