*
⚪
पुष्प = {६५},
⚪
*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*
त्या पहिल्या भेटीनंतर महाराजांनासुद्धा यल्लूबाईंचा लळा लागला. ते लहर आली की त्यांच्या घरी जात. त्यांच्याकडून गाणी म्हणवून घेत.
बापूला आता हे सगळं कळलं होतं. माईंकडे जायला त्यालाही आवडू लागलं होतं. आणि त्यातलं एक कारण होतं की, माई त्याला इतरांसारखं 'बापू' न म्हणता 'नाथा' म्हणत.
परंतु माईंची ओळख नसताना महाराज पहिल्यांदा जेव्हा त्याला म्हणाले की, 'बाप्या, यल्लूमाईकडे जायचंय. दाणेआळीत. चल, माझ्याबरोबर.' तेव्हा तो गोंधळून जागच्या जागीच उभा राहिला होता. दाणे आळीत ? आणि तेही एका बाईकडे ? त्याला ती कल्पनासुद्धा कशीशीच वाटली. पण त्याला 'नाही, होय' करायला वेळच मिळाला नाही. तिथे असलेले पोस्टखात्यात नोकरी करणारे महाराजांचे एक भक्त रामभाऊ रानडे त्याला म्हणाले, "बापू, तू एक हात धर महाराजांचा, मी दुसरा धरतो."
बापू निघाला खरा, पण मनातून अस्वस्थच होता. त्याला भीती वाटत होती की आपल्याला दाणे आळीत जाताना कुणी ओळखीच्या माणसानं पाहिलं तर ? घरी जाऊन सांगितलं तर ?
त्या वेळची आपली मनस्थिती आठवून बापूला आता हसू आलं. त्याच्या मनात आलं की, मधल्या काळात महाराजांच्या सहवासानं आपल्यात किती बदल झाला ! लोक काय म्हणतील याची भीती नाही उरली.
याच विचारात त्यानं सायकल बाहेर काढली. पुढच्या दांडीवर पोत्याची घडी टाकली. महाराजांना त्यावर बसवलं आणि ते दोघं रस्त्याला लागले. आर्यन सिनेमागृहावरून रामेश्वर चौकात तो बाजूला वळला. तेव्हा महाराजांनी त्याला म्हटलं, 'आता दगडूशेट दत्त मंदिराकडून चल." बापूनं 'होय' म्हणून सायकल त्या दिशेनं वळवली. देवळाजवळ येताच महाराज पटकन उडी मारून खाली उतरले आणि रस्त्याच्या मधोमध जाऊन बसले. बापूला काहीच कळेना.
रस्त्यानं येणारी-जाणारी वाहनं त्यांच्यामुळे अडू लागली. कुणी म्हणालं, 'अरे, कोण हा वेडा ? असा मधोमध काय बसलाय फतकल घालून ?'
तर कुणी तिथेच थांबून या विक्षिप्त म्हाताऱ्यानं वाहता रस्ता कसा बंद पाडलाय ते मजेनं पाहत होते.
'अरे, हा कोण ? कुणी आणलं याला इथे ?" अशी चौकशीही सुरू झाली.
बापू सगळं ऐकत होता. पण करणार काय ? तो बिचारा सायकल रस्त्याच्या एका बाजूला लावून उभा होता. त्याला घाम फुटला होता. चिडलेल्या लोकांनी आपल्यालाच मारलं तर ?
अर्धा तास झाला. हा प्रकार चाललेलाच होता.
मंगळवार पेठेत असलेल्या आखाड्यात आज कुस्त्यांच्या चढाओढी होत्या. त्यांत विजयी झालेल्या पहिलवानाची मिरवणूक नेमकी याच रस्त्यानं येऊ लागली. 'कोल्हापूरवाले दटके चलो, दटके चलो' अशा त्यांच्या ललकाऱ्या ऐकू येऊ लागल्या. तेव्हा बापू धीर करून महाराजांजवळ गेला. "पहिलवान येताहेत महाराज, आता तरी उठायला हवं." त्यावर महाराज मोठ्यानं हसले. म्हणाले, "अरे, त्यांच्यासाठीच तर आम्ही इथे थांबलो आहोत ना एवढा वेळ !"
तेवढ्यात मिरवणूकीच्या पुढे आलेले काही मल्ल बापूला म्हणाले, "काय रे पोरा, तुझा आहे ना हा म्हातारा ? त्याला बाजूला ने ना !"
"ते उठत नाहीत."
तोच दुसरा मल्लही ओरडला, "अरे, हटाव बुढ्ढे को ! हटाव !!"
"माझ्याच्यानं नाही उठवत. तुम्हीच उठवा."
"अच्छा ! आत्ता उचलून ठेवतो त्याला तुझ्या सायकलीवर." असं म्हणत तो महाराजांना उचलू लागला, पण महाराज तूसभरही हलले नाहीत. एक, दोन, तीन - एकापाठोपाठ सर्व मल्लांनी प्रयत्न केला, पण महाराज जसे जडशीळ होऊन जमिनीला खिळून राहिले होते.
शेवटी तो मिरवीत येणारा विजयी मल्लही तिथवर येऊन पोहोचला. त्याला हा प्रकार कळताच तो पहिलवानांची कुचेष्टा करीत म्हणाला, "एका पांगळ्या थेरड्याला उचलता येत नाही, कशाला रे तालीम करता ? त्यापेक्षा बांगड्या भरा हातात ! मी बघा कसा मुंगीसारखं देतो त्याला फुंकून! एका चिमटीनं उचलून !"
महाराज पुन्हा एकदा मोठमोठ्यानं हसले.
आता तर तो विजयवीर रागानं लाल झाला. त्यानं महाराजांना दोन्ही हातानं धरलं. पण... पण महाराज रेसभरही हलेनात. त्यांना उचलण्याची गोष्ट तर दूरच राहिली. पुन:पुन्हा प्रयत्न करणारा तो पेहेलवान घामाघूम झाला. सर्वांसमोर होणाऱ्या या फजितीनं लज्जित झाला. त्याच्या आत्मप्रौढीच्या वल्गना महाराजांनी खोट्या ठरवल्या होत्या.
अखेरीस त्यानं महाराजांचे पाय धरले. म्हणाला, "आपली ताकद मी ओळखली नाही. क्षमा करा."
"भोसडीच्या! माझी कसली क्षमा मागतोस ? आपल्या गुरूची क्षमा माग. त्याचे पाय धर." आपले तेजस्वी डोळे त्याच्यावर रोखून महाराज कडाडले. "कुस्ती जिंकल्याचा तुला एवढा माज ? गुरूच्या खांद्यावर बसून मिरवीत आलास ?"
"चुकलं, महाराज."
"चुकलं ना ? मग चूक सुधार. तू त्याला खांद्यावर घे."
"जीऽ... जी महाराज. गलती झाली. माफी करा."
मग महाराजांनी तिथे जमलेल्या गर्दीतल्या एका शाळकरी मुलाला खुणेनं जवळ बोलावलं. तो भीतभीतच महाराजांपुढे गेला.
"ये... खाऊ घे." असं म्हणून महाराजांनी खिशातले शेंगदाणे काढून त्याला दिले. 'हं, उठव मला."
त्या मुलानं नुसता हात धरला आणि महाराज उठले. म्हणाले, "चल बाप्या! झालं आपलं काम !"
बापूनं सुटकेचा निश्वास टाकला. मग ते दोघे यल्लूबाईंच्या वाड्यात खालच्या बाजूला काही बिऱ्हाडकरू राहत होते. वरच्या मजल्यावर माई आणि त्यांची वृद्ध आई, दोघी राहत होत्या. वाड्यात मागच्या बाजूला एक औदुंबराचा वृक्ष होता. त्याच्या छायेत दत्तपादुकांची स्थापना केलेली होती. जवळच एका लहानशा देवळीत दिवा तेवत होता.
माडीवर बैठकीच्या जागी समोरच श्रीदत्तगुरू आणि श्रीशंकर यांच्या मोठ्या तसबिरी होत्या. त्यांना सुवासिक हार घातलेले होते. त्यांच्या उजव्या बाजूला तानपुऱ्यांची नक्षीदार देखणी जोडी होती.
'माईऽ... माईऽ...' अशा मोठ्यानं हाका मारीतच महाराज आत आले.
यल्लूबाई लगबगीनं बाहेर आल्या. त्यांना पाहताच, 'आम्ही आलो माई, आम्ही आलो' असं म्हणत महाराज एखाद्या बालकासारखे त्यांना एकदम बिलगलेच. आणि आपला पराक्रम अभिमानानं आईला सांगावा तसं म्हणाले, "आज आम्ही एका पैलवानाला शहाणा करून आलो. त्याला धडा शिकवून आलो."
त्यांना थोपटीत माईंनी मोठ्या मायेनं म्हटलं, "होय ? असं केलंत ? छान केलंत! पण कसा धडा शिकवलात ?'
"तो विचार या बाप्याला."
"होय रे, नाथा ? असं काय केलं महाराजांनी ? सांग तरी."
"मारूतीनं भीमाचा गर्व उतरवला होता ना माई, तस्साच महाराजांनी त्या माजलेल्या मल्लाचा गर्व नाहीसा केला. अगदी दुसरे मारूतीच झाले होते महाराज." असं म्हणून बापूनं तो रस्त्यातला सर्व किस्सा अगदी हावभाव करीत माईंना रंगवून सांगितला.
हे सर्व ऐकत महाराज तक्क्याला टेकून पाय पसरून मजेत बसले होते. मध्येच म्हणाले, "आमचे पाय दाब. पाय दाब."
माई त्यांच्या पायावरून हात फिरवू लागल्या......क्रमशः ...
*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
No comments:
Post a Comment