*⚪
⚪पुष्प ={६८},⚪
⚪*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*
श्री. बाबूराव रूद्र हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. हे मूळचे सोलापूरचे राहणारे. तिथे ते राजा धनराजगिरजी यांच्याकडे नोकरी करीत असत.
एकदा ते राजा धनराजजींच्या बरोबर मोटारीने बाहेरगावी जात असताना भररस्त्यात मध्येच एका माणसाने हात दाखवून मोटार थांबवली. बघतात तो समोर केशरी रंगाचा जरीचा रुमाल डोक्याला बांधलेली, अंगात केशरी कोट घातलेली एक व्यक्ती उभी होती. ती व्यक्ती गाडीजवळ येऊन ओरडली, "बाब्या... तुला हा राजा पाहिजे की आत बसलेला ?" आणि तिने बाबूरावांच्या खांद्यावर हात ठेवला.
खांद्याला या व्यक्तीचा स्पर्श होताच बाबूरावांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अति जुनं आणि अति जवळचं माणूस अचानक भेटावं तसा आनंद त्यांना झाला. त्यांनी हातातली पिशवी सामानासकट मोटारीतून खाली टाकली. आपल्या धन्याला म्हणाले, "मला आपल्या नोकरीतून मुक्त करा. मी चाललो. माझ्या गुरूंबरोबर चाललो."
मग ते त्या व्यक्तीबरोबर गेले. ती व्यक्ती होती सोलापूरातल्या शुभराय मठातले जनार्दनस्वामी.
एकदा बाबूरावांना घेऊन स्वामी नगरच्या रावबहाद्दूर नवले या महाराजांच्या एका भक्ताकडे गेले. तेव्हा योगायोगाने महाराज त्यांच्या घरीच होते.
नवल्यांच्या घरी कीर्तन सुरू झालं. निरूपणाला नामदेवरायांचा अभंग घेतला होता- 'माझे गडी कोण कोण घ्यावे निवडोनी.'
कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनात असा काही रंग भरला की महाराज उठून नाचू लागले. म्हणाले, "पहा माझे गडी कोण कोण आहेत, पहा."
जनार्दनस्वामींनाही राहावलं नाही. त्यांनी महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं. या दोघांची भेट पाहणाऱ्या बाबूरावांना ते दाटल्या गळ्यानं म्हणाले, "हे आमचे धनी बरं बाब्या, हे आमचे धनी!"
तेव्हापासून आपल्या गुरूंच्या या अवलिया गुरूवर बाबूरावांचाही जीव जडून गेला. यांना या आजोबांचा मोठा लळा लागला.
पुढे बाबूराव पुण्यात आले. पी. डब्ल्यू. खात्यात पट्टेवाल्याचे काम करू लागले. महाराज त्यांच्याकडे पुष्कळदा जात. असेच एकदा ते तिथे आहेत असं कळल्यावर श्री. रावसाहेब, बापू इत्यादी मंडळी त्यांच्या भेटीला निघाली. तेवढ्यात एक वेदांचा अभ्यास करणारे आणि आताशा ज्ञानेश्वरीही वाचणारे विद्वान पंडित तिथे आले. त्यांनी रावसाहेबांना विचारलं, "काय हो, बऱ्याच साधूसंन्याशांशी तुमची ओळख आहे म्हणून विचारतो, आपण जे ग्रंथांतून वाचतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती आणून देणारे कुणी आहेत का ?"
"आहेत. आम्ही अशाच एका ठिकाणी निघालो आहोत. यायचं तर चला, आमच्याबरोबर. योग असला तर पटेल त्यांची ओळख तुम्हांला."
मग ते सर्व कसबा पेठेतल्या जुन्या काळभैरव मंदिराजवळ असलेल्या बाबूराव रूद्रांच्या घरी गेले. जागा लहान, अंधारी. नोकरीवरून घरी आलेले बाबूराव भाजी चिरत बसले होते. त्यांची पत्नी झोपलेली होती. बहुधा तिला बरं नसावं. कारण तिच्या उशाशी औषधाची बाटली होती. जवळच अर्धवट सोललेलं मुसंबं होतं. त्यांच्या दोन लहान मुली खेळत होत्या.
महाराज तिथेच बसून चहा करीत होते. दोन-अडीच कप पाणी स्टोव्हवर उकळत होते. "या... या... आज आम्ही सर्वांना चहा पाजणार आहोत." रावसाहेबांना पाहताच महाराज मोठ्या उत्साहानं म्हणाले.
सर्वजण दाटीवाटीनं बसले. पंडितांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या होत्या.
चहा झाला, "बाब्या, कपबशा आण. महाराजांनी असं सांगताच बाबूरावांनी दोन-तीन कपबशा समोर मांडल्या. कानतुटके कप-विजोड बशा.
त्यातूनच सर्वांनी आळीपाळीनं चहा घेतला. दोन-तीन कप केलेला चहा आठ-नऊ जणांना पुरून उरला.
हे नवल प्रत्यक्ष पाहूनही पंडितांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. पंडितांच्या अहंकाराने त्यांची दृष्टी अधू झाली होती.
महाराज स्वतःशीच बोलावं तसं म्हणाले, "मनुष्य नाकावर बोट ठेवून बोलतो. मिशीवर ताव मारतो. नाक वर काढून चालतो. पण त्या नाकात किती घाण आहे; हे त्याच्या लक्षात येत नाही."
महाराजांनी हातावरच नाक शिंकरलं. तो मोठा बेडका पाहून पंडितांनी 'शीऽऽ' म्हणत तोंड फिरवलं.
"नाकातला शेंबूड इतका किळसवाणा वाटतो. पण सगळ्या शहाणपणाला, विद्वत्तेला नासून टाकणारा तो अहंकार ? तो मात्र छातीशी धरून मिरवावा असं वाटतं ! बाबूराव, अरे अहंकार असल्या लोकांना वेडापिसा करतो. त्यांच्या मानगुटी बसतो. तेराव्या अध्यायात ती ओवी आहे ना, ब्याऐंशी रे... ती वाच.
बाबूरावांनी ज्ञानेश्वरी आणली, ते वाचू लागले -
"नवल अहंकाराची गोठी। विशेषें न लगे अज्ञानापाठी।
सज्ञानाचे झोंबे कंठी। नाना संकटीं नाचवी॥८२॥"
बाबांनो, अनुभूती उगीच येत नाही. अभिमानाचं भूत आधी मानगुटिवरून उतरावं लागतं.
हंऽ आता नववा अध्याय काढ. वाच त्यातली अठ्ठ्याहत्तरावी ओवी."
बाबूराव ओवी वाचू लागले -
"म्हणोनि थोरपण पऱ्हां सांडिजे।
एथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे।
जैं जगा धाकुटे होईजे। तैं जवळीक माझी ॥३७८॥"
"कळलं ?" महाराजांनी पंडितांकडे रोखून पाहत विचारलं. पंडितांच्या डोळ्यावरचा अहंतेचा पडदा दूर झाला. "कळलं... कळलं..." ते खालमानेनं, हात जोडीत म्हणाले, "या गरीब माणसाच्या घरातलं समाधान आणि आपल्यासारख्या सिध्दांचं इथलं वास्तव्य... सगळ्याचा उलगडा झाला. महाराज, चूक समजली."
"समजली ना ? अरे, मी भोळ्या- भाबड्यांचा, भक्त-भाविकांचा दास आहे. पण गुंडपुंडांचा गुरु आहे. मला अहंकारी लोकांचा तिटकारा आहे. मी त्यांच्या वाऱ्यालाही उभा राहत नाही.
बोलता बोलताच महाराज उठून उभे राहिले. म्हणाले. "चला... आपल्याला मरगीच्या अड्ड्यात जायचंय."
महाराजांना घेऊन मंडळी काळ्या जोगेश्वरीजवळच्या एका विडीच्या दुकानात आली. तिथल्या मुसलमान दुकानदाराने सर्वांचं प्रेमाने स्वागत केलं.
दुकानाच्या आतल्या बाजूला एका गोणपाटावर एक व्यक्ती बसलेली होती. मळकं धोतर. अंगात नेहरू शर्ट, त्यावर जाकीट. डोक्यावर जुनाट टोपी. तिचे डोळे कुठल्या तरी अज्ञात विश्वात लागलेले होते. देहभान विसरल्यासारखे. त्या व्यक्तीचं नाव होतं, फकीरबाबा.
महाराज त्यांच्याजवळ जाऊन बसले. त्यांनी त्यांचे दोन्ही हात हातात घेतले. अत्यानंदानं ते मोठ्यानं हसले. फकीरबाबांनी मात्र मंद स्मित केलं.
दोन महान सिध्दांची अदभूत भेट घडत होती. महाराजांनी विडी पेटवली. बाबांच्या हातात दिली. रावसाहेबांनी सिगरेट पेटवून महाराजांना दिली.
धूम्रपान करता करता दोघेही एकमेकांकडे पाहून किंचित हसत होते. शब्दावाचून संवाद घडत होता. मौनातून भाव संक्रमित होत होता. बोलावाचून अर्थ उलगडत होता.
थोड्या वेळानं महाराज म्हणाले, "राऊ, ही खरी तूर्यावस्था. सदगुरू स्वामी याला कधी वैखरीवर आणील न कळे. निवृत्तिनाथांनी माझ्या ज्ञानदेवाला अशाच अवस्थेत काही काळ ठेवलं होतं. मग जगाच्या कल्याणासाठी वैखरीवर आणलं. ती वैखरी म्हणजेच ज्ञानेश्वरी."
"ती काही 'वाचासिद्धी' नव्हती. तर ती वाचाच सिद्ध होती. परा वाचा होती. हा फकीरबाबा बोलू लागला तर तसेच अमृतालाही पैजा जिंकणारे बोल हा बोलेल."
फकीरबाबांची विडी संपत आली होती. उरलेलं थोटुक त्यांनी तोंडातच टाकलं.
दुकानाच्या मालकानं सांगितलं की ते बोलतच नसत. फळं समोर ठेवली तर सालीसकट आतल्या बियांसकट खात. कुणी काही दिलं तर घेत. एवढंच.
सर्वांना नवल वाटलं की, या दोन सिध्दांची भेट झाली खरी, पण दोघे एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. अशी कशी ही भेट ? कुठल्या माध्यमातून घडला असेल त्यांचा संवाद ?.....क्रमशः ...
*⚪ लेखन: श्रीमती मृणालिनी जोशी⚪*
No comments:
Post a Comment