*⚪
⚪पुष्प = {६७},⚪
⚪*
*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची....*
महाराजांचा संचार कुठेही असायचा. त्याला स्थळकाळाचं बंधन नसायचं. शोधायला जावं तर सापडायचे नाहीत, नाहीतर ध्यानीमनी नसताना अचानक 'दत्त' म्हणून समोर उभे राहतील.
त्या दिवशी ते पुण्यात आलेत असं कळलं म्हणून बापू त्यांचा शोध घेत निघाला. ते शनिपाराजवळच्या पटवर्धनवाड्यात मोतीवाले लागू यांच्या घरी त्याला भेटले.
श्री. लागूंची जागा प्रशस्त होती. त्यांचं दुकान दिवाणखान्यातच होतं. तिथे गिऱ्हाइकांना बसण्यासाठी लहान लहान गाद्या आणि लोड मांडून ठेवलेले होते. महाराज त्यातल्याच एका लोडाला टेकून ऐसपैस बसले होते. त्यांच्यासमोर पांढरंशुभ्र तलम धोतर आणि त्यावर तसाच पांढरा सदरा घालून श्री. लागूही बसले होते. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर राखी रंगाची शेरवानी घातलेले, डोक्यावर फरची गोल टोपी असलेले आणि विड्यानं तोंड रंगलेले खानसाहेब बसले होते.
खानसाहेब हे सिटीपोस्ट चौकातल्या डेक्कन वाँच कंपनीचे मालक होते. त्यांची आणि महाराजांची पहिली भेट मेहेंदळे वाड्यात झाली होती. रावसाहेबांचे मित्र नूरी हे खानसाहेबांचेही मित्र होते. खानसाहेब एकदा त्यांना म्हणाले, "आपल्या धर्मात सांगितलं आहे ते ते मी सगळं नीट करतो. पण मनाला शांती लाभत नाही. अस्वस्थ वाटतं. काय करावं ?"
"असं ? मग चल, मी तुला एका अवलियाकडे घेऊन जातो. ते करतील तुझं समाधान."
ते दोघे वाड्यात गेले तेव्हा महाराज आठ-दहा माणसांच्या कोंडाळ्यात बसले होते. खानसाहेबांकडे पाहताच ते एकदम ओरडले, "ए मुसलमाना ! पळ इथून, बसू नकोस. बोल, तू खरा मुसलमान आहेस ? गुरु केला आहेस? नमाज पढतोस ?"
या सरबत्तीनं खानसाहेब गोंधळले. त्यांना भीतीनं घाम फुटला. चारचौघांत असा अपमान झाला म्हणून राग आला. दु:खही झालं. ते ताडकन परत जायला निघाले, पण नूरीसाहेबांनी त्यांचा हात धरून त्यांना थांबवलं. कारण महाराजांचा राग आपल्या भल्यासाठीच असतो हे त्यांना अनुभवानं कळलेलं होतं.
तेवढ्यात महाराजांनी त्यांना जवळ बोलावलं. सौम्य शब्दांत म्हटलं, "तुला हवीय ती शांती मिळेल. नमाज लक्ष देऊन, मन लावून, अर्थ समजून पढत जा. आणि मग मला येऊन भेट.
खानसाहेब तसे बाहेरून रागावले असले तरी मनातून त्यांना महाराजांच्याविषयी एक प्रकारची अनामिक ओढ लागली. ते काही दिवसांनी पुन्हा महाराजांना भेटले. त्या वेळी मात्र महाराजांनी त्यांचं प्रेमानं स्वागत केलं. त्यांना नमाजातले बारकावे समजून सांगितले. कुराणातल्या काही वचनांचा अर्थ सांगितला. उर्दू आणि पर्शियन भाषेतले उतारे म्हणून दाखवले. त्यांच्या निर्गुण उपासनेचं मर्म त्यांना विशद करून सांगितलं.
खानसाहेब मग महाराजांचेच झाले. त्यांना गुरूस्थानी मानून वरचेवर त्यांचं दर्शन घेऊ लागले. मनातल्या शंका विचारू लागले.
बापूला आलेला पाहिला तेव्हा महाराजांनी त्याला हातानेच 'ये. बस.' असं खुणावलं. बापूनं त्यांना नमस्कार केला आणि तोसुद्धा त्या सर्वांची चाललेली चर्चा ऐकत एका कडेला बसला.
महाराज बोलत होते. त्यांचं बोलणं चटकन कळत नसे. अगदी लक्ष देऊन ऐकावं लागे. शिवाय एखादा विषय सलगपणानं सांगत नसत. थांबून थांबून सांगत. पण जे सांगत ते महत्त्वाचं असे. त्यातल्या शब्दांची फोड करून त्यातून अगदी वेगळाच अर्थ लावून दाखवीत.
महाराज म्हणत होते, "अरे खानसाहेब, नमाज पढणारा खरा नमाजी कोण ? उभा-आडवा वाकतो तो ? नाही. नाही. ज्याला कुठल्याही कृतीचा माज नसतो, 'हे मी करतो आहे' असा ज्याला अहंकार नसतो तो नमाजी. माझ्या हातून जे घडतं ते सर्व 'अल्लाच' करतो असं ज्याला वाटतं, जो अल्लाच्या मर्जीनं वागतो, तो नमाजी. अल्लाशी एकरूप झालेला, अकर्ता."
"महाराज" , लागूंनी विचारलं, "आपल्या धर्मातसुद्धा असे नमाजी असतीलच ना ?"
"हो... हो... असे अनेक नमाजी आहेत आपल्यात. जो शिष्य गुरूशी एकरूप होतो, त्याला सर्वस्व अर्पण करतो, जो स्वतः उरतच नाही तो आपला नमाजी.
महाराजांच्या या बोलण्यावर सर्वजण विचार करीत असतानाच महाराज म्हणाले, "अरे, चहा आणा... चहा आणा!"
महाराज आनंदात असले की असा चहा मागत. लहान मुलासारख्या जवळच्या माणसांच्या खोड्या काढीत. हसत. आत्ताही ते तशाच लकेरीत होते.
बापूकडे बघून महाराज लागूंना म्हणाले, "तुम्हांला माहित आहे का? हा बाप्या. आमच्या बेबीच्या वाड्यातला. काय रे तू इकडे कसा आलास ?"
"तुमचं दर्शन घ्यायला आलो, महाराज."
"हात् वेड्या! तुझा आदिनाथ तुझ्याजवळ आहे ना ? त्याचं दर्शन घे. आतलं दर्शन घे. त्याला ओळख. बाहेरच्या आदिनाथाला-शंकराला भुरू नकोस!"....क्रमशः ...
*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
No comments:
Post a Comment